वरसाडे तांडा(पाचोरा) येथीलं आश्रम शाळेत उत्साहात भटके विमुक्त दिन साजरा. गुणवंताचा सत्कार, कार्यक्रमाची रेलचेल..
वरसाडे प्र पा (ता. पाचोरा ) – श्रीमती कसळाबाई शकंर पवार प्राथमिक व माध्यमिक आश्रम शाळा वरसाडे तांडा येथे आज दिनांक ३१ ऑगस्ट २०२५ रोजी भटके विमुक्त दिन मोठ्या उत्साहात आणि सामाजिक बांधिलकी जपत साजरा करण्यात आला.
या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान भटक्या विमुक्त समाजाच्या गावाचे नेतृत्व करणारे नाईक श्री.रंगलाल गोविंदा राठोड ( संचालक , ग्राम विकास मंडळ पिंपळगाव हरेश्वर ) यांनी भुषविले. या कार्यक्रमाला रविवार असुनही सर्व विद्यार्थी , शिक्षक, ग्रामस्थ तसेच सामाजिक कार्यकर्त्यांची उपस्थिती लाभली होती.
कार्यक्रमाची सुरुवात बंजारा समाजाचे समाजसुधारक संत श्री सेवालाल महाराज, बंजारा समाजाचे नेते व माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक व सरस्वती माता यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून करण्यात आली.
आश्रम शाळेचे माध्यमिक विभागाचे मुख्याध्यापक श्री.साईदास राठोड सर यांनी प्रास्ताविक मांडतांना आपल्या भाषणात क्रिमिनल ट्रायब्स ॲक्ट म्हणजे काय, हा कायदा का लागू करण्यात आला, त्याचा समाजावर कसा अन्याय झाला आणि अखेर ३१ ऑगस्ट १९५२ रोजी कसा रद्द करण्यात आला याचे माहितीपूर्ण सादरीकरण केले. विशेषत: “जन्मतः गुन्हेगार” हा कलंक समाजावर लादला गेला होता, एखाद्या गावात चोरी झाली तर पोलीस काहीही पुरावे नसले तरी गावातील भटक्या विमुक्तांना पकडून न्यायचे, खुप मारायचे. कुठे प्रवास करायचा असला तर भटक्या विमुक्त समाजातील लोकांना पोलीसांची परवानगी घ्यायला लागायची.. त्यातून भटक्या विमुक्तांना शिक्षण, नोकरी, घर आणि सन्मान हिरावून घेतला गेला होता. देश 1947 ला स्वतंत्र झाला पण भटक्या विमुक्तांना खऱ्या अर्थाने स्वातंत्र 1952 ला हा कायदा रद्द झाला तेंव्हा मिळाले. म्हणजे भटक्या विमुक्तांचा आज स्वातंत्र दिवसचं आहे अशा पद्धतीने उपस्थितांना मुख्याध्यापकांनी आजच्या दिवसाचे महत्व पटवुन दिले.
कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी भाषणातुन भटक्या विमुक्तांच्या राहणीमान , पंरपरा , होणारे हाल याची मांडणी करुन वातावरण भारावून टाकले. काही विद्यार्थ्यांनी “भटके-विमुक्त समाजाच्या हक्कांसाठी अजूनही आपण सजग राहिले पाहिजे” असा ठाम संदेश दिला.
प्राथमिक व माध्य विभागाच्या विद्यार्थ्यांनी सांस्कृतीक वारसा जपत विविध बंजारा गाण्यावर नृत्य सादर केले.
याच कार्यक्रमात भटक्या व विमुक्त समाजातील उद्योजक व माजी विद्यार्थ्याचा सत्कार केला गेला.
सन 2024-2025 मध्ये इयत्ता 10 वी वर्गातुन प्रथम व द्वितीय आलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांना बक्षीस देवुन सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाच्या शेवटी बंजारा समाजाच्या रुढी पंरपरेनुसार संत श्री सेवालाल महाराज यांना नैवेद्य दाखवला गेला.
कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून श्री.राजाराम पवार, श्री.देविदास राठोड, सरपंच श्री.पवन पवार , उपसरपंच श्री.विनायक राठोड, माजी सरपंच श्री.शिवदास राठोड, ग्रा. सदस्य डाँ श्री. नितीन चव्हाण, श्री. बंन्टी राठोड, श्री.प्रकाश जाधव, पोलीस पाटील श्री.राजाराम राठोड गावातील जेष्ठ नागरीक श्री.पोपट राठोड, श्री युवराज नवले, श्री रणजित चव्हाण व सर्व ग्रामस्थ मंडळीची उपस्थिती होती.
हा कार्यक्रम उत्साहात पार पडावा म्हणुन आश्रम शाळेचे माध्यमिक विभागाचे मुख्याध्यापक श्री.साईदास राठोड सर, प्राथमिक विभागाचे मुख्याध्यापक श्री. सतिष राठोड सर , पर्यवेक्षक श्री.मालकर सर व सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी आठवड्याभरापासुन खुप मेहनत घेतली. आठवड्या भरापासुन शाळेच्या विद्यार्थ्यांची शाळेतचं आरोग्य तपासणी करण्यात आली व शाळेमार्फतच मुलांचे आयुष्यमान भारत कार्ड काढण्यात आले.
या कार्यक्रमाला बंजारा समाजाचे वक्ते श्री.योगेश राठोड यांनीही विद्यार्थ्यांना व उपस्थित ग्रामस्थांना बंजारा बोलीभाषेत मार्गगदर्शन केले. त्यांच्या उपस्थितीने कार्यक्रम बहरुन गेला.
या अतिशय सुंदर कार्यक्रमाचे संपुर्ण सूत्रसंचालन श्री .चारु राठोड सर यांनी केले.
कार्यक्रमाच्या शेवटी श्रीमती. अर्चना तेली मँडम यांनी सर्व उपस्थित मान्यवरांचे आभार मानले व आभारप्रदर्शन करताना सांगितले की, “अशा कार्यक्रमांमुळे विद्यार्थ्यांना सामाजिक इतिहासाची जाण होते आणि आपला समाजभान अधिक बळकट होते.”
आज संपूर्ण आश्रम शाळा परिसर या कार्यक्रमामुळे उत्साहाने आणि ऐतिहासिक जाणीवांनी भारावून गेला होता.












टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा